आह! एक जीवघेणी वेदना
नखशिखान्त पसरली
चला, अजून एक झुळुक तरी सरली
संपेल आता ही धुरकटलेली पहाट
आणि सापडेल सूर्यालाही वाट
पसरून आपले किरणरूपी बाहू, पृथ्वी कवटाळायला
मिठीची उब द्यायला
मग दिवसाची चिंता नाही, भीक मागून मिळत बरंच काही
या साधू संतांच्या देशात,
रात्रीच्या कृष्ण-कृत्यांनंतर दिवसा दानधर्म करणारे बरेच आहेत,
आणि त्यावर जगणारेही
मग परत सूर्यास्तानंतर , तेच युद्ध;
जीवन पणाला लावून
तुटकी बंडी अन फाटक धोतर; जोडीला कुरतडलेला स्वेटर आणि कानटोपी
बरं झालं उंदरानं कुरतडली; म्हणून तेवढी तरी लाभली
नाही म्हणायला मढ्यावरची; चांगली शाल मात्र गावली
एवढीच दौलत, जमीन-जुमला; ना घर ना घाट
असाच स्टेशनच्या कोपऱ्यात
पडलो असीन घटका मोजत
आणि अशाच गोठवणाऱ्या झुळुका झेलत.
अरे हे काय? अजून धुकं नाही उतरलं? कोंबडं नाही आरवलं?
कदाचित त्यालाही गिळलं थंडीनं.
आज पर्यंत आजूबाजूचे दहा गेले; उकिरड्यावरच पडली होती मढे
आता दोन तीनच उरलेत
आ S आई SS बहुतेक आजचा दिवस नाही नशिबात!
उकिरड्यावर पडायची देहावर पाळी येणार
आणि आत्मा यम घेऊन जाणार
स्वर्ग कुठला आलाय नशिबात ? नरकात पण इतका गारठा असतो का ?
नसेल तर मग उचल लगेच!
हा S हा हा SS हे काय ?
पायांना विचित्र गुदगुल्या; थांबवा थांबवा
थांबल्या एकदाच्या, संवेदने पलीकडे
पाय होते का मला?
शरीर की लाकूड हालत का नाही?
पडले निर्जीव दगडासारखं;
बरं झालं!
आता येऊ दे हवा; पडू देत थंडी, मला ...
काय शब्द गोठले की विचार?
की पोचलोय या सगळ्याच्या पार?
बघा धुकं उतरलं; उठा सूर्याचं स्वागत करायला
पण पण मी हालत का नाही?
माझ्या भोवती का जमत आहेत सगळे?
काय म्हणतोय तो ? काल रेकॉर्ड ब्रेक थंडी होती
असेल मला काय? मी वाचलो ना!
अरे! मीच उठतो; कशाला उचलताय मला ?
ए खोटारड्या, काय बकतोस ? मरून अर्धा तास झालंय मला?
हे बघ, मी जिवंत आहे; पण माझं शरीर अस का?
निर्जीव दगडासारखं ? संवेदनेच्या पालीकडलं
काय होती शेवटची जाणीव ?
हो ती जीवघेणी झुळुक; बहुतेक .....
अर्ध्यातासापूर्वी!-- अश्विन
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा