रविवार, १ नोव्हेंबर, २००९

आई तेंव्हा कळते

मुगूटराव काकडे महाविद्यालय बारामती येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा काव्यवाचन स्पर्धा २००१, प्रथम क्रमांक विजेती कविता

आरशामध्ये आपुल्या जागी
दिसतो एक अनाथ अभागी
जेव्हा भासतो सुखी अचानक
देवळापुढचा तो महारोगी
या आपुल्या अवस्थेवर जेव्हा मन हुळहुळते
आई तेव्हा कळते



हृदयावरती घाव उमटतो
तोल मनाचा तेव्हा सुटतो
जीवनाच्या सर्व आशांचा
गाव जेव्हा समक्ष जळतो
एक चांदणी मीणमीणनारी, स्वप्नांना जागवते
आई तेव्हा कळते


क्षणात जेव्हा वादळ वारे,
उध्वस्त करती जीवन सारे
तेव्हा मात्र नेत्रकवाडी
मर्दपणाचे कड़क पहारे
कोंडलेल्या भावनांना कुणी मग नयनाची दिशा देते
आई तेव्हा कळते


जीवनगीत गाण्यासाठी
शब्द मात्र अड़खळती ओठी
तेव्हा भासते अनुपम माया
उभी आहे अपुल्यापाठी
आठवणीत मग नयनामध्ये पाणी जेव्हा तरळते
आई तेव्हा कळते


सूर्य तापतो डोक्यावरती
पाय जाळते रेती
जीवनाच्या वळणावरती
निखळूनी पड़ती नाती
तरीही केसामधूनी कोणी मायेचा हात फिरवते
आई तेव्हा कळते


थंडीत बोचऱ्या दुःखाच्या मग
पुरत नाही श्वासांची धग
राहते बुद्धी संकोचुनी
मुक्तपणाचा येतो उबग
अशाच वेळी अंग पांघरत एक चादर येऊन पडते
आई तेव्हा कळते


सूर्य विझतो, चंद्र हरवतो
निराशेत आपण चाचपडतो
मधुर स्वप्नाचा शीशमहलही
भग्न होऊन मातीस मिळतो
बोट धरूनी कोणी तेव्हा चालायास शिकवते
आई तेव्हा कळते


आई म्हणजे नसते व्यक्ती
असतो एक स्वभाव
वात्सल्याचा असते सागर
स्वार्थाचा जेथे अभाव
पदराखाली लपण्यासाठी जेव्हा मन आसुसते
आई तेव्हा कळते


-- अश्विन


© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा