रणरणत्या उन्हात भाजत होत रान
अंतिम घटका मोजत होत वाळलेलं पान
त्या उन्हाच्या झळा घेऊन धावत होता वारा
त्या झळांनी उकडत होता आसमंत सारा
उष्णतेने तडकूनी भूमी, पडल्या होत्या भेगा
भासत होत्या हातावरल्या दुर्दैवी नशीब रेघा
तहानेने होऊनी व्याकुळ तळमळत होती मुले
नरक यातना भोगीत, तडफडत होती गुरे
दुःख: पाहूनी धरणीवरचे आकाश काळवंडले
आज नभाचे अश्रूखाली वसुधेवर सांडले
धुरकटलेल्या दिशा फिसकटलेले रंग
गडगड गडगड वाजू लागले मेघमृदुंग
तप्त जीवांना करुनी थंड पसरला मृद्गंध
कोकिळेच्या कंठातूनी स्रवू लागे आनंद
वसंताने केली जादू हिरवे झाले रान
नैराश्याच्या भावनेत उदेले चैतन्याचे उधाण
फुले फुलली मने जुळली
आज धरेची काळी खुलली
पक्षी गगनी फिरू लागले
घरटे कलकल करू लागले
क्षितिजाच्या भिजल्या कडांवर
इंद्रधनूची नक्षी अंबरावर
डोंगरावरती हिरव्या कुरणावर
पाडसपदाना कसला आवर
या भूमीवर करुनी जादू
कधी बनवे नरक, तर कधी स्वर्ग
धन्य निसर्ग ! धन्य निसर्ग ! धन्य निसर्ग !
-- अश्विन
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा