कविते, तू का गेलीस दूर मजापासूनी
काही पाहीले विरह उन्हाळे, तरीही मन न सुकले
सृजनाच्या तव ओलाव्याला कधीही ते न मुकले
आपुलकीच्या सरी मायेच्या, मैत्रीच्या प्रेमाची भरती
सुख श्रावणी चिम्ब जाहलो, सर्व भोगले तुझ्या सोबती
प्रणयाच्या थंडीत गुलाबी, तुझ्यामुळे तर फुलला वसंत
पण आज तू मजवर रूसली, ही जीवाला एकच खंत
जिकडे तिकडे शब्द उधळती, लड तयांची साधत नाही
अर्थही उगाच भरकटतो, मेळ त्याचा मिळत नाही
नको असे ग छळू तू मजला, आपण दोघे नाही दोन
माझ्याविना तू नाही अन तुझ्याविना मी कुठला कोण?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा