पाच मित्र आम्ही
भिड्यांचा बंड्या, काळ्यांचा जितू
आपट्यांचा सोम्या नि जोश्यांचा अत्तू
पाच मित्र आम्ही
एकत्रच खेळलो, पडलो, वाढलो
एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकलो
पाच मित्र आम्ही
मागे-पुढेच मुंजी झाल्या, शिक्षणही झाले
नोकरी मागे धावत सरले ऋतू कोरडे ओले
पाच मित्र आम्ही
लग्न झाली, पोर झाली, ओढला संसार गाडा
बांधली सोसायटी पाडून जुना चौसोपी वाडा
पाच मित्र आम्ही
मुल पंखात बळ घेऊन, गेली भुर्र उडून
म्हातारं मन मात्र बसल जुन्या गल्लीत दडून
पाच मित्र आम्ही
जुन्या पारावरच्या गप्पा, आता हास्य क्लब झाला
आणि घोळक्यातला एकेक निरोप देऊन निघाला
पाच मित्र आम्ही
मागल्या वर्षी बंड्या गेला, सहा महिन्यांपूर्वी अत्तू
मागल्या महिन्यात सोम्या, नि काल रात्री जितू
पाच मित्र आम्ही
संपत आली एक पिढी, नाही काही उरले
शरीर जरी उभे, मन कधीच सरपणावर चढले
आता फक्त झुरणे, पाहत मृत्यूची वाट
आजच संपेल सगळ? कि असेल उद्याची पहाट
सगळ आयुष्य सारखंच जगलो, ह्यातच कसा बदल होईल?
आज ना उद्या, उद्या न परवा, संपून सगळंच जाईल
मागे-पुढेच जन्मलो, मागे-पुढेच मरू
सारखंच आयुष्य जगलो, आताही सारखेच ठरू
पाच मित्र आम्ही
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक
http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.