शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

प्रीत नवी

आला आला वारा आला

आला आला वारा, मन ढवळून गेला
गुपित सारे माझे तुला कळवून गेला
आला आला वारा आला

फुलांचीही लाडे लाडे कुजबुज झाली
गालावर त्यांच्याही फुलली कळी
भिजवले चिंब जश्या कोसळल्या धारा
गार गार मन झाले, वैशाखात गारा

आला आला वारा आला

ढगाळलेल्या आभाळात कडाडते वीज
ओरडते तुला, जा त्याच्यासवे भीज
भेटते नजर, जाते जगच वाहून
जुना अनुभव नवा वाटतो फिरून 

आला आला वारा आला 

स्वच्छ झाले ढग, गेले मळभ धुऊन
नव प्रीत जुळे तुला परत पाहून
तीच तू, मी ही, तरी सर्व काही नवे
पावसाचे थेंब जोडी मनांचे हे दुवे



© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंकhttp://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

सूर

मी छेडले सुरांना, एकांती या क्षणाला
अन स्रवू लागली ही, नशीली सुरा सुरांची 

नकले मला स्वतःला, कधी अर्थ शोधताही
जाणवे परमात्म सत्य, आनंद भोगताही
कधी ओढ़ भावनांची, कधी त्या पुढे ही  काही
कधी उमटे ठसा क्षणाचा, कधी उमटत काही नाही 

परी सूर कोरडे हे, वाही धुरा श्रावणाची 

जनकही मी, मीच जननी, पण माझी न मालकीही
मी उत्पन्न त्यास करतो, पण कर्तृत्व माझे नाही
हे शब्दांच्या पलीकडले, अन सुरांच्या पुढेही
म्हणावे तर स्वत्व जपले, म्हणले तर फाडलेही

अवस्थाच ही अगदी भिन्न, मुग्ध स्वानंद ध्यानाची  

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंकhttp://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.